DESK MARATHI NEWS NETWORK.
उल्हासनगर/प्रतिनिधी -उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील ३१ घरे आणि एका मशिदीला दिलेल्या नोटिसांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या महामोर्चात मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधित नोटिसा तातडीने रद्द करून कारवाई थांबवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. महामोर्चादरम्यान नागरिक आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी उल्हासनगर शहराच्या उभारणीत वंचित आणि कष्टकरी समाजाच्या योगदानाचा उल्लेख करत महानगरपालिका प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले की, उल्हासनगर शहर उभे करण्यासाठी वंचितांची मेहनत आवश्यक होती. शहरात उद्योग, कारखाने, कपड्यांचा बाजार आणि पैसा आल्यानंतर मात्र व्यापाऱ्यांना प्राधान्य देऊन मेहनत करणाऱ्या वंचितांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच उल्हासनगरमधील मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, पारशी समाजाचे फायर टेंपल, बुद्ध विहार तसेच इतर जुनी धार्मिक स्थळे यांना विशेष विंडोच्या माध्यमातून नियमित करून अधिकृत दर्जा देण्यात यावा. कोणत्याही धार्मिक स्थळावर तोडक कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, महानगरपालिकेने ३१ घरे आणि मशिदीला दिलेल्या नोटिसा तात्काळ मागे घेऊन कारवाई थांबवावी, अशी ठाम भूमिका सुजात आंबेडकर यांनी मांडली. तसेच उल्हासनगरमधील सर्व घरे नियमित करण्यात यावीत. संबंधित नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल आणि इतर आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत प्रत्येक घराची मालकी संबंधित नागरिकांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सरकारने तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या महामोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



