DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. वि. पेंढारकर महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांच्या मालिकेतील प्रमुख कार्यक्रम म्हणून येत्या २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ‘आजच्या काळात महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर भव्य परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालय व्यवस्थापनाच्या डॉ. सुचित्रा कामत यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार असून शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ तसेच ज्येष्ठ समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
महात्मा फुले यांच्या शिक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि कृषीविषयक विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता यावर या परिसंवादात सखोल चर्चा होणार आहे. डॉ. दीपक गायकवाड, श्री. हेरंब कुलकर्णी, डॉ. लक्ष्मी साळवे आणि डॉ. प्रवीण बोरकर हे तज्ज्ञ वक्ते यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. उच्च शिक्षण विभागाचे कोकण विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, महाविद्यालयात ३ ऑगस्ट २०२६ रोजी महात्मा फुले यांच्या कार्यावर आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, उत्तेजनार्थ बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार असून परिसंवादाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या ऐतिहासिक संस्थेला यंदा १५३ वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा फुले यांनी मांडलेले समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि स्त्री सक्षमीकरणाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच त्यांच्या कार्याचे समकालीन संदर्भात चिंतन घडवून आणणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.



