DESK MARTAHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातर्फे तसेच श्री तिसाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले. कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोड येथून कोकण, सातारा, कोल्हापूर यांसह विविध गावांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या मातीशी आणि आपल्या गावाशी नाळ जोडणारा सण मानला जातो. मुंबई आणि उपनगरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे अनेक चाकरमानी गणरायाच्या आगमनासाठी दरवर्षी आपल्या मूळ गावी जातात. मात्र, सणाच्या काळात वाढणारी प्रवाशांची संख्या, गर्दी आणि वाढलेले प्रवासाचे दर लक्षात घेता त्यांच्या सोयीसाठी या मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले.
आमदार गणपत काळू गायकवाड यांच्या प्रयत्नातून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव काळात चाकरमान्यांसाठी ही सेवाभावी परंपरा सुरू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आपल्या माणसांना गणेशोत्सवासाठी सुखरूपपणे त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बस चालक आणि वाहकांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच गावी जाणाऱ्या सर्व चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक प्रवास सुखरूप व्हावा आणि प्रत्येक कुटुंबात आनंद, समाधान व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
या उपक्रमाला युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गणपत गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संजय मोरे, सुभाष म्हस्के, नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड, सरोज राय, इंदिरा तरे, मंडळ अध्यक्ष नितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, संतोष शेलार, अमित गायकवाड, सुनील आमने, संदीप तांबे, लल्लन कनोजिया, मयुरेश तरे, गुड्डू खान, अमोल साळुंके, अनिल म्हात्रे, चेतन म्हात्रे, सविता देशमुख, वंदना मोरे, रेश्मा शिरकर, जयश्री सानप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कोकणवासीय प्रवासी उपस्थित होते.
गणरायाच्या आगमनासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या सुखकर प्रवासाची व्यवस्था हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा ठरली.
- September 13, 2026



