DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी कल्याण पूर्वेतील नांदिवली तलावाच्या स्वच्छतेसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विशेष ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेला अखेर यश आले आहे. कल्याण शहर वारकरी समाज, स्वच्छ भारत अभियान टीम, केडीएमसीचे सफाई कर्मचारी आणि सुमित एल्कोप्लास्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून तलावाची आतून तसेच बाहेरून व्यापक स्वच्छता करण्यात आली.
गेल्या महिनाभरात तलावातील पाण्यात तसेच परिसरात साचलेला मोठ्या प्रमाणातील कचरा बाहेर काढण्यात आला. यामध्ये नारळ, निर्माल्य, पूजेचे साहित्य तसेच नागरिकांकडून टाकण्यात आलेला विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर आढळून आला. हा कचरा हटवून तलावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत कल्याण शहर वारकरी समाजाचे मृत्युंजय शुक्ला यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. महिनाभर सुरू असलेल्या या स्वच्छता मोहिमेला त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठी चालना मिळाली.
तलावातून बाहेर काढलेला कचरा पुन्हा परिसरात साचू नये, यासाठी सुमित एल्कोप्लास्टच्या कर्मचाऱ्यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांमधून कचऱ्याची वाहतूक करून तो योग्य ठिकाणी नेण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे कचरा हटवण्यासोबतच त्याच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेलाही मदत झाली.
महिनाभराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर नांदिवली तलावाचा परिसर आता अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत दिसत आहे. मात्र, ही स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनी तलावात निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे संरक्षण आणि सार्वजनिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. नांदिवली तलावाची ही स्वच्छता मोहीम प्रशासनासोबतच सामाजिक संस्था, नागरिक आणि उद्योगसमूह यांच्या संयुक्त सहभागातून सार्वजनिक स्वच्छता कशी प्रभावीपणे साधता येते, याचा आदर्श ठरली आहे.
- August 25, 2026



