DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि मनसे यांच्यातील राजकीय वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत नंदू परब यांनी केलेल्या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत परब यांच्यावर निशाणा साधला.
भाजप नेते बृजभूषण सिंह यांच्या नावाचा उल्लेख करत राजू पाटील यांनी, राज ठाकरे यांच्याबद्दल बोलायची त्यांची औकात आहे का?असा सवाल केला. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टीका केली. दुसऱ्या पक्षात हे चालत असेल, पण आमच्या पक्षाला याची लागण लागू नये,असा टोला राजू पाटील यांनी लगावला.
डोंबिवलीतील नेहरू मैदान आणि सावरकर उद्यानातील कार्यालयाच्या मुद्द्यावरूनही राजू पाटील यांनी भाजपला सवाल केले. नेहरू मैदान कोणाला देण्यात आलं? ते अधिकृत आहे का? सावरकर उद्यानात असलेलं कार्यालय अधिकृत आहे का?असे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणांची माहिती समोर आणण्याचा इशारा त्यांनी दिला.
दिव्यातील अनधिकृत रिक्षांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले. आमच्या नादी लागू नका; नाहीतर सगळं बाहेर काढू, असा थेट इशारा राजू पाटील यांनी दिला.
हर्षद पाटील यांच्याबाबत बोलताना हर्षद पाटील हा फक्त पदाधिकारी नाही, माझा भाऊ आहे,असे सांगत राजू पाटील यांनी त्यांच्यामागे मनसे ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले.
पक्षाच्या प्रश्नाला पक्षाच्या पद्धतीने उत्तर द्या. व्यक्तिगत टीका करू नका. वैयक्तिक बोलाल तर उत्तरही वैयक्तिक येईल,असा इशारा देत राजू पाटील यांनी नंदू परब यांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील भाजप-मनसेमधील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.



