DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीच्या राजकारणात मनसे वरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. भाजपाचे कल्याण जिल्हा नंदकिशोर परब यांनी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र पाठवून महायुतीतील शिवसेनेच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. मनसेला सत्तेतून तत्काळ बाहेर न काढल्यास भाजप स्वतंत्र निर्णय घेईल, असा थेट इशाराच या पत्राद्वारे देण्यात आलाय.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे आणि भाजपचे आक्षेप:
१. विश्वासात न घेता मनसेचा समावेश:
२०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ‘महायुती’ म्हणून लढले होते, तर मनसेने महायुतीविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला विश्वासात न घेता परस्पर मनसेला सत्तेत सोबत सामील करून घेतले, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे. भाजपने केवळ महायुतीचा धर्म पाळण्यासाठी याला विरोध केला नव्हता.
२. मनसेकडून भाजपवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका:
सत्तेत सामील होऊनही मनसेचे पदाधिकारी भाजपच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आणि महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. त्यातच ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यातील एका कॉलेजमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा काढून अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले, असा घणाघाती आरोप करत भाजपने याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
३. भाजपचा अंतिम इशारा:
भाजपने पत्राद्वारे शिवसेनेला स्पष्ट बजावले आहे की:
मनसेच्या या कृत्याबद्दल शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून मनसेला तातडीने सत्तेबाहेर काढावे.
अन्यथा, भाजप आपला स्वतंत्र निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे, याची नोंद घ्यावी.
पत्राच्या शेवटी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी “आपण महायुती मजबूत राहण्याच्या दृष्टीने योग्य निर्णय कराल” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान या पत्रामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप यांच्यात मनसे वरून वाद होण्याची शक्यता आहे
तर आता शिवसेना यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



