DESK MARATHI NEWS NETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव ते मोठागाव या महत्त्वाच्या मार्गावर पथदिवे बसविण्यात आल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच अपघातांचा धोका देखील वाढला होता.
या समस्येची दखल घेत स्थानिक नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांनी पाठपुरावा करून रस्त्यावर नवीन पथदिव्यांची व्यवस्था उभारली. या विकासकामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे नंदू परब स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पथदिव्यांमुळे संपूर्ण मार्ग उजळून निघाला असून रात्रीच्या वेळी प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. विशेषतः कामानिमित्त उशिरापर्यंत बाहेर असणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालक यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
यावेळी बोलताना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. तर नगरसेवक जयेश म्हात्रे यांनी नागरिकांच्या सहकार्यामुळे विकासकामांना गती मिळत असल्याचे नमूद केले.
पथदिव्यांच्या कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच पायाभूत सुविधा आणि विकासकामे राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.



