DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून शहरातील मुख्य रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवलीतील फेरीवाल्यांनी महापालिका मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन सुरू केले. महापालिकेने फेरीवाला धोरण तातडीने राबवावे आणि पथविक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
डोंबिवली फेरीवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप करत भ्रष्टाचार होत असल्याचा दावा केला. उपायुक्त प्रसाद बोरकर, प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर आणि भारत पवार यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, डोंबिवली शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फुल विक्रेते, मच्छी विक्रेते, हातगाडी चालक यांच्यावर अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र ही कारवाई करताना फेरीवाला कायद्यातील नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
गेल्या बारा वर्षांत महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले नाही, अधिकृत परवाने दिले नाहीत. उलट हप्ते घेऊन गरीब फेरीवाल्यांना देशोधडीला लावले जात आहे. दीडशे मीटर नियमाच्या नावाखाली संपूर्ण शहरात कारवाई केली जात आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
तसेच मोठ्या ऑनलाईन विक्री कंपन्यांकडून हप्ता घेत लहान फेरीवाल्यांवर अन्याय केला जात असल्याचाही आरोप संघटनेकडून करण्यात आला.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि फेरीवाल्यांना न्याय मिळाला नाही, तर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल,असा इशारा भाऊ पाटील यांनी दिला आहे.



