नवी दिल्ली/प्रतिनिधी – इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री महामहिम डॉ. अब्बास अरघची यांनी आज (8, मे 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.भारत- इराण यांच्या राजनैतिक संबंधांना यंदा 75 वर्षे पूर्ण होत असताना डॉ. अरघची यांच्या दौ-याला विशेष महत्व असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी नमूद केले.हजारो वर्षांपासून भारत आणि इराणमध्ये संबंध आहेत असेही राष्ट्रपती म्हणाल्या. कला आणि संस्कृतीच्या प्रत्येक बाबतीत, मग ती भाषा आणि साहित्य असो किंवा संगीत आणि खाद्यपदार्थ असो, आपल्याला एकमेकांच्या वारशाची झलक दोन्ही देशांमध्ये पहायला मिळते.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या द्विपक्षीय संबंधांना नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीचा भक्कम आधार आहे. मागील 75 वर्षांमध्ये भारत आणि इराणमधील संबंध विविध क्षेत्रात वृद्धिंगत झाले आहेत – मग ते सांस्कृतिक सहकार्य असो, व्यापार आणि ऊर्जा भागीदारी असो किंवा प्रादेशिक आणि जागतिक व्यासपीठांवर धोरणात्मक समन्वय असेल. दोन्ही देशांनी दीर्घकालीन मैत्री केवळ कायम राखली नाही तर प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी देखील एकत्र काम केले आहे. चाबहार बंदराच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये सुरू असलेल्या सहकार्याचे त्यांनी स्वागत केले.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इराणने दिलेल्या एकजूटीच्या आणि करुणेच्या संदेशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले. राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, या भेटीमुळे भारत-इराण द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील.