रत्नागिरी/प्रतिनिधी – रोज लाखोंच्या संख्येने जनता एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करते. स्वस्तात आणि जलद प्रवास करण्यासाठी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांची रोज गर्दी जमलेली असते. पण रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या असणाऱ्या दापोली एसटी बस डेपोत आज प्रवाशांची तारांबळ उडाली. डिझेलचा तुटवडा झाल्याने पूर्ण वाहतूक खोळंबली. लांब पल्ल्याच्या गाड्या डिझेल नसल्यामुळे आगारात थांबून राहिल्या आहेत. कालपासून डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने लामच्या पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. लहान मुलं, वृद्ध यांचे प्रचंड हाल झाले.
कधी बस दुरुस्तीला दिलेली असते, बसचे डिझेलच कधी संपते तर कधी ड्रायवरच नसतो अशा अनेक तक्रारी दापोली एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केल्या आहेत. हंगामात डिझेलचा तुटवडा झाल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. खोळंबा झाल्याने त्रस्त प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासणाने एसटी महामंडळाच्या बस डेपोत होणाऱ्या या समस्यांवर योग्य तो तोडगा काडावा आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.