नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटसं ठीकपुर्ली गाव. साधारण 6-7 हजार लोकसंख्या या गावाची ओळख इथल्या खवा बर्फी वरून आहे. या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील खवय्यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते. इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचे उत्पादन घेतात. गावात गेल्या अनेक वर्षांपासून खवा बर्फी बनवली जाते 1990 च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून चांगलं अर्थाजन मिळतं हे लक्षात येऊ लागलं.यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली. आणि हळूहळू ठीकपूर्लीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारा गाव अशी होऊ लागली.त्याच बरोबर खवा बर्फीची निर्मिती करून गावाने आर्थिक किमया साधली आहे.
बर्फी निर्मिती मुळे गावातील तरुणांच्या हाताला रोजगारही उपलब्ध झाला आहे. दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनविण्याच्या कामास सुरुवात होते. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. मोठ्या काहिलीत दहा लिटर दुधाचे आधण असते. गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधण लागते. दीड ते दोन तासांत बर्फी तयार होते. जिभेवर येताचं वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी ही बर्फी परदेशातही जाते तर या व्यवसायातून लाखोंची कमाई होते.