नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण/ प्रतिनिधी– कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी ३८८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी १ कोटी २७ लाख रुपयांचा भरणा केला.
कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार ३८८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व एक कोटी २७ लाख २ हजार रुपयांची वसूली झाली. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात ४२ ग्राहकांनी ३४ लाख ६ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातील ७१ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा करणाऱ्या २१८ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील ३४ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत १७ लाख २५ हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ९४ ग्राहकांनी ३ लाख ९३ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.
लोक अदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधिक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, उपविधी अधिकारी दीपक जाधव, सहायक विधी अधिकारी सुहास बाराहाते, राजीव वामन व शिल्पा हन्नावार यांनी विशेष प्रयत्न केले.