कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असतानाच बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्यात अजून भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण ट्रॅफिक पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली.
स्मार्ट सिटीचे काम सुरू होण्यापूर्वीही कल्याण स्टेशन परिसर शेकडो रिक्षा उभ्या -आडव्या कशाही पध्दतीने लावून इतर वाहनांना अडथळा निर्माण करणे हि बेशिस्त रिक्षा चालकांना नवीन बाब नाही. मात्र याचा नाहक त्रास हा सामान्य नागरीकांना सहन करावा लागतो. नागरिकांचीही रिक्षांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाक होण्याचे चित्र सकाळ व संध्याकाळी कल्याण स्टेशन परिसरात पहावयाला मिळते. त्यातच गेल्या काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमूळे वाहतूक कोंडीत भर पडण्यासह नागरिकांनाही स्टेशनवरून बाहेर पडण्यास आणि स्टेशनवर जाण्यास अडथळा येत होता. त्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्याने कल्याण शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कारवाई केली.

यावेळी स्टेशन परिसरातील सुमारे 800 ते 1 हजार रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. कल्याण आरटीओकडून 41 आणि वाहतूक पोलिसांकडून 44 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून आरटीओचे सुधारित नियम लागू करण्यात आले असून त्यात पूर्वीपेक्षा अधिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबतही नागरिक आणि वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहनही तरडे यांनी यावेळी केले आहे.



