नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जालना/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीचा उत्सव देशभर साजरा केला जात आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र या सगळ्यातच जालना लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदानाच्यावेळी मोठा राडा झाला. कारण मतदान सुरू असताना जालना शहरातील डबल जिम भागामध्ये मतदान यंत्रात अदलाबदली झाली. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे नाव खालीवर झाल्याचा गंभीर आरोप जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केला. जोपर्यंत मतदान यंत्र सुरळीत करून देत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी फोन कॉलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची रीतसर तक्रार केली. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.
तर या सर्व प्रकाराला माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले “काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण मतदारांचा सर्व कल हा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे असल्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल हे बिन बुडाचे आरोप करत आहेत.” असा टोला त्यांनी गोरंट्याल यांना लगावला.



