नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने रात्रीच्या सुमारास कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास करत कॅब चालक राकेश जयस्वाल याला नवी मुंबई ऐरोली येथून बेड्या ठोकल्या आहेत.
संबंधित पीडित तरुणी ही नवी मुंबई परिसरात एका कंपनीमध्ये काम करते. तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास काम आटोपून ती घराच्या दिशेने निघाली. कल्याण येथे येण्यासाठी तिने नवी मुंबई येथून कॅब बुक केली. या कॅबने प्रवास करत असताना कॅब चालकाने पीडित तरुणीचा विनयभंग केला. पीडितेने आरडा ओरड करताच कॅब चालकाने कल्याण सूचक नाका परिसरात तरुणीला खाली उतरवून तेथून पळून गेला.
या घटनेमुळे रात्री अपरात्री कॅबने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिडीतेने घडल्या प्रकाराबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या कॅब चालकाचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी नवी मुंबई ऐरोली येथून राकेश जयस्वाल या कॅब चालकाला अटक केली आहे.