नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला असताना, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण ह्या तथाकथित मराठा नेत्यांना किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सुप्रीम कोर्टात गरीब मराठ्यांसाठी आरक्षण का टिकवता आले नाही? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.
“त्यांची आंतरवली सराठी येथे भेट आणि त्यांची पोकळ आश्वासने ही सर्व नौटंकी आहे. तसे नसते तर त्यांनी ‘रयत मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण’ ह्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न केले असते, ताकद उभी केली असती, धोरण बदलायला दडपण आणले असते. उलट निजामी मराठा नेत्यांच्या भेटी मुळे ओबीसी आणि रयत मराठ्यांच्या मध्ये तणाव वाढला आहे.” असा आरोपही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, मराठा समाजाने निवडणुकीत योग्य भूमिका घ्यावी ह्यासाठी आवाहन केले ,तेव्हा ते म्हणाले “सर्व रयत मराठ्यांना माझे आवाहन आहे. ह्यातून दंगल न घडवता ही मार्ग निघू शकतो. निवडणुकीत जाती आधारित नाही तर मानवी मूल्यांवर, न्याय्य मागण्यां साठी भूमिका घ्या. ह्याच मार्गाने आपल्या आरक्षणाची मागणी कोणत्याही समाजाला न दुखावता प्रभावी पध्दतीने पुढे रेटता येईल.”