DESK MARATHI NEWS.
भिवंडी-प्रतिनिधी – भिवंडी लोकसभा क्षेत्रात सत्ताधारी खासदारांना जे दहा वर्षात जमले नाही,त्या कामांना मी एक वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्याला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने भिवंडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत भिवंडीकरांना टोरंट संदर्भात दिलेल्या आश्वासनावर बोलताना मागील दहा वर्षात टोरंट पावरचा ट ही कोणी उच्चारला नव्हता, पण मी त्यावर लोकसभा सभागृहात आवाज उठवला आहे.२०२७ नंतर टोरंट बाबत सर्वांच्या साथीने योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी खासदार म्हात्रे यांनी दिले.
शहर व ग्रामीण च्या १५ लाख लोकसंख्येच्या आरोग्याची काळजी घेणारे स्व इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा जिल्हा रुग्णालय करावा यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य आरोग्य विभागाकडून या बाबत सर्वेक्षण सुरू केले आहे अशी माहिती खा.बाळ्या मामा यांनी दिली आहे.
भिवंडीकरांसाठी रेल्वे प्रवास जलद व्हावा यासाठी वसई दिवा रेल्वे मार्गावर भिवंडी ते दिवा दरम्यान रेल्वे सेवा वाढवावी तसेच लांब पल्ल्यांच्या या मार्गावरील गाड्यांना भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली असून मुरबाड रेल्वे मार्गाचा तत्कालीन खासदारांनी पाठपुरावा केला नव्हता, तो आपण केल्यानंतर हे काम प्रगतीपथावर पुढे सरकले आहे.
शाहपूरचा पाणी प्रश्न गंभीर आहे.भावली प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव निधीस मंजुरी दिली.पण जलशुद्धीकरण प्रकल बनवला नाही. ठेकेदारांना पाईप लाइन टाकण्यात व श्रेय घेणाऱ्यांना ठेकेदाराची बिले मंजूर करून टक्केवारी घेण्यात स्वारस्य आहे.महसूल मंत्र्यांकडे जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव पडून होता.त्याचा पाठपुरावा केल्याने जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला असल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.
भिवंडी शहरातील वऱ्हाळ तलाव सुशोभीकरण कामासाठी केंद्राने ५३ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला पण ४० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून मिळाव यासाठी माझे राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत.
महामार्ग व राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या हा कळीचा मुद्दा आहे.त्याच्या सोडवणुकीसाठी शासन यंत्रणा व पोलिस प्रशासन यांच्या कडून योग्य ते सहकार्य मिळत नाही.पाच वेळा बैठका घेऊन आम्ही सांगितलेल्या उपाययोजन प्रशासनाने न राबविल्यास या पुढे कोणाला हात जोडणार नाही तर जनतेच्या रोषाला यंत्रणेला सामोरे जावे लागेल असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.भिवंडी ठाणे बायपास रस्त्याचे आठ पदरी काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून तपासणी होऊन त्याचा अहवाला सदर केला जाणार आहे.तर मुंबई वडोदरा महामार्गावर भिवंडी वज्रेश्वरी दरम्यान महापे येथे वळण रस्ता दिल्यास त्याभागाचा विकास होऊन लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी अहवाल तयार करून निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्टेम कडील विविध ग्रामपंचायत थकीत बिल व व्याज माफी संदर्भात मी स्वतः ४ मार्च रोजी नियोजन भवन येथे बैठक घेऊन निर्णय झाला होता त्यानंतर काम होत आहे हे समजल्यावर १६ मार्चला माजी खासदारांनी पत्र देऊन याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असा टोला माजी खासदार कपिल पाटील यांचे नाव न घेता लगावला.
बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये जमीन विक्री व्यवहारात काही शे कोटी रुपयांचा भष्टाचार झाला आहे.याची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्या नंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेस चौकशीचे आदेश दिले आहेत.लोकसभा क्षेत्रात एक केंद्रीय विद्यालय स्थापन व्हावे यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्या बाबत लवकरच निर्णय होणार आहे असे शेवटी खा.बाळ्या मामा यांनी स्पष्ट केले.