DESK MARATHI NEWSNETWORK.
डोंबिवली/प्रतिनिधी – राजकारणात कायमचा कोणी शत्रू नसतो,याचा प्रत्यय पुन्हा एकदा डोंबिवलीतील राजकारणात पाहायला मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यातील दुराव्याला अखेर पूर्णविराम मिळाला असून, दोघांनीही विकासासाठी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे.
डोंबिवली पश्चिमेत भाजपकडून अपेक्षित विकास निधी मिळत नसल्याच्या नाराजीतून विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे यांच्या मतदारसंघात विविध विकासकामांचे उद्घाटन केले. मात्र कुंभारखाना पाडा येथील मंदिर कमानीच्या कामावरून दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी कविता म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता.
या पार्श्वभूमीवर विकास म्हात्रे यांच्या जागेवर इतर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी भाजपकडून युवासेना पदाधिकारी अनमोल म्हात्रे तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्यात आला. मात्र महायुतीचा अंतिम निर्णय होताच कविता म्हात्रे, विकास म्हात्रे, प्रकाश भोईर तसेच अश्विनी अनमोल म्हात्रे यांना एकाच पॅनलमधून उमेदवारी देण्यात आली. तरीही विकास म्हात्रे यांची नाराजगी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरील आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिल्याने महायुतीच्या चारही उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती.
ही स्थिती लक्षात घेऊन काल रात्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व मतभेद विसरून प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते आणि परिसरातील मूलभूत सुविधांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महायुतीतून योग्य विकास निधी निश्चितपणे मिळेल, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले.
बैठकीनंतर आज विकास आणि कविता म्हात्रे उमेदवारी अर्जांच्या छाननीसाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांच्या शर्टवर धनुष्यबाणासोबतच कमळ चिन्हही दिसून आले, ज्यामुळे राजकीय एकजुटीचे स्पष्ट संकेत मिळाले.
विकास म्हात्रे हे विकासासाठी धडपड करत होते म्हणून विकासाला प्रकाश देण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत असे माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले
आम्हीदोघे चांगले मित्र आहोत आता मिळून प्रभागाचा विकास करू असे ही ते म्हणाले
यावेळी विकास म्हात्रे म्हणाले, नागरिकांच्या विकासासाठी आम्ही आता एकत्र लढत आहोत. बैठकीत नागरिकांचा रोष व्यक्त झाला होता, मात्र पाणी, रस्ते आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी योग्य विकास निधी मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
एकंदरच, डोंबिवली पश्चिमेत दीर्घकाळ सुरू असलेली नाराजगी बाजूला ठेवत महायुती आता एकदिलाने निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



