नवी दिल्ली/प्रतिनिधी -राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) 18 मे 2025 रोजी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. एनसीसीच्या मोहिम पथकाने यशस्वीरीत्या जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट (8,848 मीटर) सर केले आहे. या पथकात 10 एनसीसी छात्र (पाच विद्यार्थी आणि पाच विद्यार्थीनी), चार अधिकारी, दोन कनिष्ठ अधिकारी, एक महिला छात्र प्रशिक्षक आणि 10 बिगर कमिशन्ड अधिकारी सहभागी होते.
हे निवडलेले छात्र गिर्यारोहण क्षेत्रात नवखे होते. त्यांची निवड संपूर्ण भारतातून काटेकोर चाचणीनंतर करण्यात आली होती. त्यांनी कठोर निवड व प्रशिक्षण प्रक्रिया पार केली. तयारीचा भाग म्हणून त्यांनी माउंट अबी गामिन येथे एव्हरेस्टपूर्व मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर 15 छात्र असलेल्या अंतिम पथकाची निवड झाली. त्यांनी सियाचिन बेस कॅम्प वरील लष्कराच्या गिर्यारोहण संस्थेमध्ये हिवाळी आणि तांत्रिक प्रशिक्षण घेतले. अनेक महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर 10 छात्र माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी निवडले गेले.
या मोहिम पथकाचे सरासरी वय फक्त 19 वर्षे असून, हे सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून ओळखले गेले. चढाई दरम्यान विविध टप्प्यांवर जुळवून घेण्याच्या प्रशिक्षणात त्यांच्या तंदुरुस्ती आणि शिस्तीचे विशेष कौतुक झाले. नेपाळमधील शेर्पा मार्गदर्शकांनी या पथकाच्या शारीरिक तयारी आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले.
आव्हानात्मक हवामान आणि कठीण भूभाग असूनसुद्धा, या छात्रांनी भारताचा तिरंगा ध्वज तसेच एनसीसीचा ध्वज जगातील सर्वोच्च शिखरावर फडकवला. या माध्यमातून राष्ट्रगौरव आणि युवकशक्तीचे प्रतीक साकार झाले.
या मोहिमेला 3 एप्रिल 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. एनसीसीची ही तिसरी एव्हरेस्ट मोहिम आहे — यापूर्वीच्या मोहिमा 2013 आणि 2016 मध्ये झाल्या होत्या.