DESK MARATHI NEWS.
भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडीतील नागरिकांना मुंबई शहराशी जोडण्याबरोबरच शहरातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून सीएसटी मुंबईसाठी लोकल रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. मंगळवारी खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची दिल्ली येथे भेट घेतली यावेळी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांना दिले.
यंत्रमाग व्यवसायाबरोबरच गोदाम पट्टा भिवंडी व परिसरात मोठ्या प्रमाणात विकसित झाला असून भिवंडी ठाणे मुंबई सह इतर शहरातून नागरिक भिवंडीत कामानिमित्त दररोज येत असतात.तसेच भिवंडीतील नागरिकांना ठाणे मुंबई व आजूबाजूच्या शहरांमध्ये कामानिमित्त प्रवास करावा लागतो.मात्र, रोजची वाहतूक कोंडी व राज्य परिवहन वाहनांची अपुरी व्यवस्था यामुळे येथील नागरिकांना मुंबई प्रवास करणे अत्यंत कठीण झाले असून भिवंडी रोड ते मुंबई सीएसटी पर्यंत लोकल सेवा सुरु केल्यास येथील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार असल्याचे खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या लक्षात आणून दिले.
या भेटी दरम्यान मुरबाड नवीन रेल्वे मार्ग, कल्याण-असनगाव तिसरी लाईन, कल्याण-कसारा चौथी लाईन आणि कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी लाईन या प्रलंबित विषयांकडे देखील खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे लक्ष वेधले.रखडलेल्या या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय मंजुरी, निधी व तांत्रिक प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी विनंती यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली.
भिवंडी लोकसभा मतदार संघातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत तसेच भिवंडी ते सीएसटी मुंबई पर्यंतच्या लोकल रेल्वे सेवेत बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्याला दिले असून या सर्व प्रकल्पांमुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघासह ठाणे, रायगड आणि पालघर या परिसरातील लाखो नागरिकांना रेल्वेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. प्रवाशांसाठी अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून स्थानिक आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.