DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीवर आता तक्रारीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेना (शिंदे गट) कल्याण पश्चिमचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी या सोडतीतील विसंगतींवर राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक हरकत नोंदवली आहे.
पाटील यांनी आपल्या तक्रारीत प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मधील आरक्षण रचनेवर गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, या तिन्ही प्रभागांमध्ये आरक्षणाचे वितरण SC, ST, OBC आणि सर्वसाधारण घटकांमध्ये न्याय्य प्रमाणात झालेले नाही, तसेच काही समाजघटकांना अपेक्षित प्रतिनिधित्व नाकारले गेले आहे.
पाटील यांनी म्हटले आहे की, सध्याची आरक्षण रचना समाजातील सर्व घटकांना समान न्याय देणारी नसून, त्यात अनुचित असमानता आहे. प्रभागानुसार आरक्षणाचे संतुलन राखण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.
या संदर्भात त्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे तक्रार सादर केली असून त्रुटी दूर करून आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याची मागणी केली आहे.
तसेच, योग्य दुरुस्ती न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
सध्या जाहीर केलेली आरक्षण रचना (प्रभाग 3, 5, 15):
प्रभाग क्रमांक 3
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती (महिला)
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
ड – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 5
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड – सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक 15
अ – अनुसूचित जाती (महिला)
ब – अनुसूचित जमाती (महिला)
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड – सर्वसाधारण
आरक्षण सोडतीवरील या हरकतीनंतर केडीएमसी निवडणुकीचा राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळात निवडणूक आयोगाकडून या तक्रारीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



