DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी -मानवाला निसर्गाने विनामूल्य असा पर्यावरण रूपी ठेवा दिला आहे.त्याचे रक्षण व जतन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मानवाची आहे, पण मानवाकडून विकासाच्या नावावर अनेक कारणाने पर्यावरणाचा रास होतांना दिसत आहे. जर मानवाच्या पुढच्या पिढीला सुखाने नांदवायचे असेल तर पर्यावरणाचे रक्षण करणे ही खूप महत्वाची बाब आहे. आपले अस्तित्व मानवाला टिकवायचे असेल तर जमेल त्या मार्गाने पर्यावरणाच्या रक्षणाचे प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
शासकीय मार्गदर्शक सूचनानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून दिनांक २२ एप्रिल २०२५ ते १ मे २०२५ या कालावधीत जागतिक वसुंधरा दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेश घाट परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमात महापालिका आयुक्त अभिनव गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव तसेच महापालिका सचिव किशोर शेळके यांचे सह महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी, इंडियन मेडिकल असोसिएशन चे प्रतिनिधी, विविध सेवाभावी संस्था, NGO आणि “मनुसृष्टी पर्यावरण सल्लागार” संस्थेच्या प्रतिनिधी उपस्थित होते.या मोहिमे दरम्यान खाडी किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या आणि इतर घाणीची साफसफाई करण्याचे अभियान राबवण्यात आले.
पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाशी सुसंवाद राखणे, हीच वसुंधरा दिनाच्या साजरीकरणाची खरी दिशा आहे. महानगरपालिका अशा उपक्रमांद्वारे सातत्याने नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करत राहील असे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले.
महानगरपालिकेच्या वतीने वसुंधरा दिन सप्ताहात अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी स्लोगन स्पर्धा, शॉर्ट व्हिडिओ स्पर्धा , नागरिकांचे त्यांच्या प्रभागात पर्यावरण उत्तम राहण्यासाठी चे सूचीबद्ध कार्यक्रम प्रस्ताव संकल्पना सादरीकरण करणे अशा विविध स्पर्धांचा या उपक्रमांतर्गत समावेश आहे.