DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे शहाड उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वाहन चालक आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे या पुलाचे दुरुस्ती काम काही महिन्यापूर्वी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ( पी.डब्ल्यू.डी.) करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष काम न करता केवळ कागदावरच दुरुस्ती दाखवून लाखो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.ठेकेदाराने केलेली दुरुस्ती बघता रस्त्या खड्यात गेला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे ,त्यामुळे रस्त्ये दुरुस्ती हे ठेकेदारांसाठी कुरन बनले आहे का? असाही सवाल नागरिकांच्या मनात येत आहे.
शासनाच्या बांधकाम विभागाच्या नियमानुसार ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल मार्च अखेरीस मंजूर करून दिले जाते. मात्र काही दिवसाचा पाऊस पडताच या पुलावर पुन्हा खड्डे पडले आहेत, हे पाहून ‘ पी.डब्ल्यू. डी.कल्याण व ठेकेदारांनी केवळ कागदावरच दुरुस्ती दाखवली का ?” असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. महामार्ग कल्याण ते आळेफाटा, नगर, बीड या मार्गावर असलेल्या या महत्त्वाच्या उड्डाण पुलावर रस्त्यांची चाळण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
अनेक वाहन चालक व प्रवाशी अपघाताचे बळी ठरत असून, संबंधित अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहाड उड्डाण पुलाचे दुरुस्ती काम झाल्यानंतर एवढ्या लवकर खड्डे पडणे म्हणजे स्पष्ट भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचा आरोप नागरिक करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी सरकार कडे केली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवत असून ,सार्वजनिक बांधकामाचा निधीचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.