DESK MARATHI NEWS.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कल्याण मधील उंबर्डे अमृत प्रकल्प येथे वृक्षारोपण करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. याचवेळी त्यांनी उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प येथे मीयावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ केला ,महापालिका परीक्षेत्रात अन्य सहा ठिकाणी देखील अशी मियावाकी जंगले तयार केली जातील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
आज देशी प्रजातीच्या सुमारे 3000 झाडांची आपण लागवड केली आहे, यापुढे लोकसहभागातून वृक्षारोपण केले जाईल ,त्याचप्रमाणे “एक विद्यार्थी एक झाड “ही संकल्पना- ही ऍक्टिव्हिटी दर महिन्यात राबविण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक मुक्त शहर हे अभियानही आपल्याला सर्वांच्या वतीने राबवायचे आहे असेही आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले.
या वृक्षारोपण अभियानात मा. आमदार सुलभाताई गायकवाड तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, एम एम आर डी ए चे अधीक्षक अभियंता, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ. प्रशांत पाटील तसेच इतर अधिकारी वर्ग, विद्यार्थी यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.
तदनंतर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरन्स हॉलमध्ये सर्व अधिकारी वर्गाच्या वतीने पर्यावरणाची शपथ घेण्यात आली.