DESK MARATHI NEWS NETWORK.
कल्याण/प्रतिनिधी – पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवाची अधिकाधिक जनजागृती व्हावी आणि जनमानसाने आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत शाडू मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करावी या हेतूने महानगरपालिका “हरित बाप्पा/फलीत बाप्पा” ही संकल्पना राबवित असून महानगरपालिका व एज्युकेशन टुडे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.12 ऑगस्ट 2025 रोजी डोंबिवली पूर्व येथील वै.ह.भ.प संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलांच्या कै. सुरेंद्र वाजपेयी सभागृहात एका भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. ही कार्यशाळा दोन सत्रात होणार असून या कार्यशाळेत महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 4,000 विदयार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ही कार्यशाळा विद्यर्थ्यांसाठी एक समृद्ध अनुभव ठरणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी शाडू माती आणि नैसर्गिक रंगाचा पर्यावरणपूरक वापर करीत पारंपारिक कला सांस्कृतिक मुल्ये आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव आत्मसात करतील अशी माहिती या कार्यशाळेच्या प्रकल्प प्रमुख तथा कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी आज मा. आयुक्त महोदय यांचे दालनात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शालेय विदयार्थ्यांमार्फत, त्यांचे पालकांमार्फत, त्यांचे शिक्षकांमार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश सर्वत्र जाण्यासाठी हे शालेय विदयार्थी स्वत: श्री गणेशाची शाडुची मुर्ती साकारणार आहेत. त्यासाठी लागणारी शाडूमाती महानगरपालिकेमार्फत पुरवली जाणार आहे,श्री गणेश मंडळांनी शक्य असेल तर 6 फुटापेक्षा कमी पर्यावरण पूरक गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करावी, विसर्जनासाठी 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे आणि शक्यतोवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केले.
शासनाच्या “घरोघरी तिरंगा” उपक्रमातंर्गत शालेय विद्यार्थ्यांमार्फत रांगोळी काढणे, राखी तयार करणे, जवानांना पत्र लिहीणे असे अनेक उपक्रम राबविले जात असून येत्या रविवारी म्हणजेच दि.10 ऑगस्ट 2025 रोजी या उपक्रमातंर्गत सायकल रॅलीचे आयोजन सकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे. अधिकाधिक नागारिकांनी “घरोघरी तिरंगा” अभियानात सहभागी होऊन पुढाकार घ्यावा असेही आवाहन महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले.