DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण शील मार्गावरील आठ वर्षापासून अर्धवट आणि ठप्प अवस्थेत असलेल्या पुलाच्या कामाविरोधात आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनाविरोधात ३१ मे २०२५ रोजी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पलावा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.शिवसेना आणि मनसे बाँडिंग दिसून आले या समस्यावर दोन्ही पक्षांना एकत्रित आंदोलन केले .
डोंबिवली पूर्वेतील कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. पुलाच्या अपूर्ण कामामुळे दररोज भीषण वाहतूक कोंडी निर्माण होत असून, स्थानिक नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा शाळांना सुट्टी द्यावी लागते अशी स्थानिकांनी सांगितले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी पुलाचे उद्घाटन लवकर होईल अशी अनेकदा आश्वासन दिले, परंतु ती फोल ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.३१ मे २०२५ पर्यंत पूल पूर्ण होईल असे दिलेले आश्वासनही अपूर्णच राहिले. आंदोलनात मनसेचे माजी आमदार राजू (प्रमोद) पाटील आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.
दोन्ही पक्षांनी मिळून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दात टीका केली. ही लढाई कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, सामान्य जनतेच्या हक्कासाठी आहे, जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना (उबाठा) व मनसे एकत्र येण्यास सदैव तयार आहेत,”असे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी स्पष्ट केले.