DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – दर वर्षाप्रमाणे या वर्षी पालिकेत महापुरुषांची विविध समाज उपयोगी कार्यक्रम साजरा करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आणि कल्याण जयंती समितीच्या वतीने २९ आणि ३० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या महापुरुषांच्या स्मृती जागवत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या आवारात मंगळवारी आयोजित कार्यक्रमात आरोग्य शिबिर, चित्र प्रदर्शन, सविधान घर , मोफत चष्मा वाटप आणि रक्तदान शिबिर यासारख्या उपक्रमांनी जनजागृती साधण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल, माजी महापौर रमेश जाधव, संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ व जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरात नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी आणि रक्तदानासह संविधान अमृत महोत्सवाच्या संविधानावर आधारित चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपायुक्त रमेश मिसाळ, उपायुक्त संजय जाधव व इतर अनेक महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बुधवारी ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. दरम्यान आचार्य अत्रे रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कल्याण डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी केले आहे. या जयंती उत्सव कार्यक्रमाच्या यशस्वीतेत्यासाठी युवराज गाडे, बाबासाहेब काकडे ,डॉ. संदीप पगारे, भूषण कोकणे ,भाऊराव ओंकारेश्वर, प्रवीण कांबळे, नवनीत गायकवाड, विलास कांबळे, यशवंत मोते, नागेश टोळ ,सुनील अंबाडे ,संजीवनी पाटकर, पौर्णिमा कांबळे ,अनिता कदम ,सीमा आठवले आदी मान्यवरांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सरकटे आणि समाधान मोरे यांनी केले.