DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – जात, धर्म आणि पंथांच्या भेदातून मुक्त समानता व मानवी मुल्यांसाठीच सर्व महामानवांनी संघर्ष केला. सर्वच महामानवांच्या विचारांमागे मानवतेच्या हिताचा एक समान धागा आहे. या विचारांचा जागर करण्यासाठी महावितरणच्या कल्याण परिमंडलाकडून आयोजित करण्यात येत असलेला महामानवांच्या संयुक्त जंयती उत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन लेखक व व्याख्याते बलभिम माथेले यांनी केले.
महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या वतीने कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (२९ मे) सायंकाळी आयोजित महामानवांच्या संयुक्त जंयती उत्सवात ते बोलत होते. सलग चौथ्या वर्षी परिमंडलाकडून संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा होते. माथेले यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारीक नात्याची गुंफण उलगडून दाखवली. तसेच भगवान गौतम बुद्धांपासून संत परंपरेतील नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, रोहिदास, सेवालाल, गाडगेबाबा आदी संतांच्या विचारांमधील समतेच्या धाग्याची उकल त्यांनी केली. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई फुले यांनी रुजविलेल्या जनकल्याणकारी मुल्यांचा जागर त्यांनी केला.
महामानवांच्या विचारांपासून कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने उपक्रमात सातत्य ठेवल्याचे मुख्य अभियंता मिश्रा यांनी स्पष्ट केले. यावेळी कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे, सहाय्यक महाव्यवस्थापक सुशिल पावसकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अभियंते, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गायके यांनी केले. तर औदुंबर कोकरे यांनी आभार मानले.
