DESK MARATHI NEWS.
नवी दिल्ली/प्रतिनिधी -अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठे पाऊल उचलत भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) दिनांक 12 आणि 13 एप्रिल 2025 दरम्यानच्या मध्यरात्री संयुक्त कारवाई करून सुमारे 1800 कोटी रुपये मूल्याचे 300 किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ ताब्यात घेतले.
गुजरात एटीएसकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे उत्तर महाराष्ट्र/दक्षिण गुजरात भागात विविधांगी मोहिमांवर निघालेले आयसीजी जहाज संबंधित ठिकाणाकडे वळवण्यात आले आणि जहाजावरील अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमेलगत (आयएमबीएल) दोन जहाजांदरम्यान मालाच्या स्थानांतरणाच्या प्रयत्नाला अटकाव केला. आयसीजीचे जहाज येत असल्याची चाहूल लागल्यानंतर संशयित बोटीवरून अंमली पदार्थांची खोकी समुद्रात टाकून देण्यात आली आणि त्या जहाजाने आयएमबीएलच्या दिशेने पळ काढला. समुद्रात टाकलेली खोकी ताब्यात घेण्यासाठी आयसीजी बोटीवरील सतर्क अधिकाऱ्यांनी तातडीने सागरी बोट तैनात केली आणि आयसीजीच्या जहाजाने संशयित बोटीचा पाठलाग सुरु केला.
आयएमबीएलचे सान्निध्य तसेच कारवाईच्या वेळी आयसीजी जहाज आणि संशयित बोट यांच्यात सुरुवातीला असलेले अंतर यामुळे गुन्हेगारांना पकडण्याच्या अगदी थोड्या वेळापूर्वी त्यांनी आयएमबीएल पार केली . त्यानंतर त्या बोटीचा पाठलाग थांबवण्यात आला आणि आयसीजी जहाजावरील अधिकाऱ्यांना संशयित बोटीवरील गुन्हेगारांना ताब्यात घेता आले नाही. दरम्यान सागरी बोटीवरील आयसीजी पथकाने रात्रीच्या कठीण परिस्थितीत परिसरामध्ये कसून शोध घेत समुद्रात टाकलेले मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थ ताब्यात घेतले.
आयसीजीच्या जहाजाने जप्त केलेले अंमली पदार्थ अधिक तपासासाठी पोरबंदर येथे आणण्यात आले. अलीकडील काही वर्षांत आयसीजी आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्तपणे राबवलेल्या अशा 13 यशस्वी कायदे अंमलबजावणी मोहिमांमधून राष्ट्रीय ध्येयांप्रतीच्या समन्वयाला दुजोरा मिळाला आहे.