DESK MARATHI NEWS.
जळगाव/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात डाळिंब पिकाचे उत्पादन खूपच महत्त्वाचे ठरते. परंतु, यासाठी कीटक व फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.
राज्यात नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरासाठी अनुदानावर देण्यात येणार असून, क्षेत्र मर्यादा 20 गुंटे ते 1 एकर दरम्यान प्रति लाभार्थी लाभ देय राहील. खर्चाचे मापदंड रु.4,24,640/- प्रती एकर व अनुदान मर्यादा रु.2,12,320/- प्रती एकर (खर्चाच्या 50 टक्के) इतकी आहे.
याकरिता आवश्यक कागदपत्रे अॅग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), 8-अ. आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु.जमाती शेतक-यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा. या योजनेंतर्गत अॅन्टी हेलनेट कव्हर प्रकल्पासाठी अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/…/AgriLogin/AgriLogin
या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
सर्व प्रवर्गातील शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin
या संकेस्थळावर जास्तीत जास्त शेतक-यांनी या घटकासाठी अर्ज करावेत असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे.