नवी दिल्ली/प्रतिनिधी -आधार प्रमाणीकरण व्यवहारांची एकूण संख्या 150 अब्ज (15,011.82 कोटी)च्या पलीकडे गेली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि व्यापक आधार परिसंस्थेच्या प्रवासात हा एक मैलाचा दगड ठरला आहे. आधारचा व्यापक वापर आणि उपयुक्तता आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेची वाढ या ऐतिहासिक घटनेतून अधोरेखित होते. स्थापनेपासून ते एप्रिल 2025 या कालावधीत ही आकडेवारी गाठली गेली.
जीवनमान सुलभ करण्यात, प्रभावी कल्याणकारी वितरणात आणि सेवा प्रदात्यांनी देऊ केलेल्या विविध सेवांचा स्वेच्छेने लाभ घेण्यात आधार प्रमाणीकरण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. केवळ एप्रिलमध्येच जवळजवळ 210 कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहार झाले, जे 2024च्या याच महिन्यातील व्यवहारापेक्षा जवळपास 8% जास्त आहेत.
बँकिंग आणि बिगर-बँकिंग वित्तीय सेवांसह इतर क्षेत्रांमध्ये ग्राहकांचा अनुभव सुधारण्यात आणि व्यवसाय सुलभ करण्यात आधार ई-केवायसी सेवा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या (37.3कोटी) गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील संख्येपेक्षा 39.7 % जास्त आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या 2393 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
यूआयडीएआय (UIDAI) ने स्वतः विकसित केलेल्या AI/ML आधारित आधार फेस ऑथेंटिकेशन सोल्यूशन्सना सातत्याने लोकप्रियता मिळत आहे. एप्रिलमध्ये असे सुमारे 14 कोटी व्यवहार झाले . या प्रमाणीकरण पद्धतीचा अवलंब आणि आधार क्रमांक धारकांना त्याचा कसा फायदा होत आहे याचे हे द्योतक आहे. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील 100 हून अधिक संस्था, सुरळीतपणे लाभ आणि सेवा प्रदान करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन वापरत आहेत.