पंढरपूर/प्रतिनिधी – पंढरपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान केले. पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण आवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे केळी बाग उध्वस्त झाली. मागील वर्षी पाण्याच्या अभावी शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागा जपण्यासाठी अक्षरश: टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या.
शेवते येथे राहणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांची ६ एकर केळीची बाग अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली आहे. केळीच्या नुकसानाची तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी केळी उत्पादक दशरथ खळगे यांनी केली आहे. युवा नेते प्रणव परिचारक यांनी आज शेवते परिसरात भेट देत जमीनदोस्त झालेल्या केळी पिकांची पाहणी केली. तसेच मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही सुद्धा शेतकाऱ्यांना त्यांनी दिली आहे.