नेशन न्यूज मराठी टीम.
मुरबाड/संघर्ष गांगुर्डे – स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना शहीद झालेले आझाद दस्त्याचे वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचा हौतात्म्यदिनी सिद्धगडावर आज जागर करण्यात आला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित केल्यानंतर शेकडो ग्रामस्थांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. या वेळी मुलांनी गायलेली राष्ट्रभक्तीपर गीते व पोवाड्याने वातावरण देशप्रेमाने भारून गेले होते.
ब्रिटीशांबरोबर लढा देत असताना सिद्धगड परिसरात वीर भाई कोतवाल व वीर हिराजी गोमाजी पाटील यांना वीरमरण आले होते. ते हुतात्मा झाल्याच्या ठिकाणी दरवर्षी २ जानेवारी रोजी पहाटे हजारो मुरबाडवासियांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. सिद्धगड स्मारक समितीच्या वतीने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आजही कार्यक्रम उत्साहात पार पडला.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते हुतात्मा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. तत्पूर्वी दोन्ही हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून हुतात्म्यांना सलामी दिली गेली.
या कार्यक्रमात क्रांतीवीरांच्या गौरवाचे पोवाडे गायले गेले. त्याचबरोबर शाळकरी मुलांसह ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागवली. या वेळी वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. हुताम्यांच्या बलिदानापासून मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांनी ही अनोखी परंपरा निर्माण केली. त्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाडवासियांचे कौतुक केले. त्याचबरोबर वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांच्या कार्याचे स्मरण करून प्रत्येकाने देशहिताच्या दृष्टीकोनातून कार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच सरकारी अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.



