कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांनी कोरोनाने मृत्यू पावलेल्या नगरसेवकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याच न्यायाप्रमाणे कोरोनामुळे बळी पडलेल्या ९७० नागरिकांच्या कुटुंबियांना देखील प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली असून या मागणीसाठी आलेल्या आपच्या शिष्टमंडळाला पालिका आयुक्तांनी भेट नाकारल्याने आप च्या पदाधिकार्यांनी पालिका मुख्यालयात ठिय्या मांडला.तर दुसरीकडे नगरसेवकांकरिता जी मदतीची संवेदना दाखविली तीच संवेदना डॉक्टरांसाठी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी दाखवायला पाहिजे होती.असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरांनी कोरोनाने निधन झालेल्या महापालिकेच्या नगरसेवकांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑक्टोबरपर्यंत कोरोनाने महापालिका क्षेत्रातील सुमारे ९७० नागरिकांचा बळी गेला आहे. हे सर्वच करदाते नागरिक असून ते सर्वच सधन घरातील आहेत असे नाही. कोरोनाला बळी पडलेल्या या ९७० नागरिकांप्रतीही महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सहवेदना व्यक्त करीत त्यांच्याही कुटुंबियांना, तसेच यापुढेही जे कल्याण-डोंबिवलीकर नागरिक कोरोनाने मृत पावतील त्यांच्या कुटुंबियांना देखील ५०-५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.तर कोविड सुरु होताच सर्वात जास्त मेहनत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिस घेत होते.खाजगी डॉक्टरांनी कोरोना काळात सेवाही दिली. यामध्ये अनेक डॉक्टरांचा जीव गेला.कल्याण डोंबिवलीतील डॉ. मिलिंद वैरागी, पंकजकुमार चौधरी आणि केडीएमसी कोविड कमिटीवर असेलले पराग पाटील यांचा दुदैवी मृत्यू झाला. त्यांचा क्लेम सरकारने रद्द केला आहे.कोविड काळात ज्यांनी लढा दिला. त्या डॉक्टरांच्या मदतीचा क्लेम रद्द होणे ही दुदैवी बाब आहे. नगरसेवकांकरीता मदतीची जी संवेदना दाखविली तीच डॉक्टरांसाठी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी दाखवायला पाहिजे होती अशी अशी खंत व्यक्त करत आमदार राजू पाटील यांनी डॉक्टरांना मदत लवकरात लवकर व्हावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.



