नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर / प्रतिनिधी – राज्याबाहेर ऊस नेण्यास यंदा राज्य सरकारने बंदी घातली आहे.अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. यंदाच्या हंगामात राज्यात उसाचे पीक खूप कमी झाले आहे.त्यामुळे गळीत हंगाम जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.म्हणूनच सरकारने राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे.
राज्यातील साखर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहावा यासाठी सहकार कायद्यातील ऊस नियंत्रण तरतुदीनुसार ही बंदी घातली आहे.यंदा राज्यात पावसाचे प्रमाण खूप कमी झालं आहे. त्यामुळे उसाचे उत्पादन देखील कमी झालं.त्यातच कर्नाटकातील गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाची पळवा पळवी होऊ शकते.मात्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस देणार, आम्हाला अडवून दाखवा असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.