नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी वंचितला अजिबात हलक्यात घेणार नाही असे वाटत होते. पण महाविकास आघाडीने शेवटपर्यंत वंचितशी जुळवून घेण्याची तयारी ठेवली होती. मात्र आयत्या वेळेला वंचित आघाडीने महाविकास आघाडीशी जुळवून न घेता यंदाच्या निवडणुकीत वंचित स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे दिसले. वंचित आणि कॉँग्रेस मधली दरी वाढत चालली होती. पण प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नाराजी दूर करा असे आवाहन काँग्रेसला केले आहे. “ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी सोडा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा” असे ते म्हणाले. यावरून विधानसभा निवडणुकीत वंचित आणि कॉँग्रेस एकत्र येऊ शकतात असे म्हणायला हरकत नाही.
काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले कि “मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेल कि, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात म्हणावे लागेल काँग्रेसकडून दिलेला ‘बळी का बकरा’ आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.
प्रकाश आंबेडकर भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जहरी टीका करत म्हणाले “2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही.” तसेच आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते यावर प्रकाश आंबेडकर यांनी समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.