ठाणे/प्रतिनिधी – ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.ठाण्यात एकीकडे अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटावर चाकूने हल्ला झाला असून त्यांची बोटे छाटली असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पिंपळे यांना तात्काळ घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकही जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे ठाण्यातील फेरीवाल्याची मुजोरी किती वाढली आहे या वरून दिसून येते. घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे याच्यावर अमरजीत यादव या भाजी विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यात कल्पिता पिपळे यांची तीन बोटे छाटली गेली असून गंभीर दुखापत झाली आहे. तर सुरक्षारक्षकाच्या ऐका बोटाला दुखापत झाली आहे.
अमरजीत यादव या हल्लेखोर भाजी विक्रेत्यांला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे या हल्यामुळे ठाणे महापलिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या हल्ल्यामुळे फेरीवाल्यांचा मुजोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.कुणाच्या आशीर्वादाने हे फेरीवाले एवढी मुजोरी करत आहे असे अनेक प्रश्न सामान्य नागरिक विचारात आहेत.