भिवंडी प्रतिनिधी– भिवंडी ठाणे महामार्गावर सध्या एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने ठाणे भिवंडी कल्याण असे मेट्रोचे काम सुरु आहे . मात्र या मेट्रोच्या कामात कोणतेही नियोजन नसल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . या वाहतूक कोंडीबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत मात्र वाहतूक पोलीस प्रशासनासह या मार्गावर टोल वसुली करणाऱ्या कंपनीचे व एमएमआरडीए प्राधिकरणाचे एकसूत्रीपणा नसल्याने या मार्गावर रोज वाहतूक कोंडी होत आहे. अनेक विनंती अर्ज करून देखील या वाहतूक कोंडीवर संबंधित विभागाने कोणताही पर्याय शोधला नसल्याने आजही या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने या वाहतूक कोंडी बाबत वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढला नाही तर वंचित बहुजन आघाडीसह, पूर्णेश्वर टेम्पो असोशिएशन व स्थानिक महिला व नागरिकांसह कशेळी टोल नाका येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील भगत यांनी आपल्या लेखी निवेदनात ठाणे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
ठाणे भिवंडी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर गोदाम पट्टा असल्याने या भागात वाहनांची नेहमी ये जा असते . त्यातच भिवंडीतील कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगारासाठी या मार्गावरून रोज प्रवास करत असतात.त्यातच आता कोरोना संकट काही प्रमाणात आटोक्यात आल्याने मुलांच्या शाळा देखील सुरु असल्याने या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यातच लॉक डाऊन नंतर आता सर्व व्यवस्थापन सुरु झाल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या मध्यभागी एमएमआरडीए प्राधिकरणाने मेट्रो ट्रेनचे काम हाती घेतले आहे . मात्र हे काम करण्या आधी या रस्त्यावर असलेली अतिक्रमणे हटविणे गरजेचे असतानाची त्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे . या वाहतूक कोंडीने कशेळी, काल्हेर , पूर्णा, राहणाळ येथे रोजगारासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच भिवंडी ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे . या मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे मात्र रस्त्यावरील अतिक्रमणे अजूनही हटविली नसल्याने तसेच रस्त्यावर स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिक आपली वाहने बेदरकारपणे पार्क करून ठेवत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे . ज्याकडे संबंधित यंत्रणा पुरता डोळेझाक करत आहे. विशेष म्हणजे काल्हेर ते राहणाळ या भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत त्याच बरोबर कोपर ते राहनाळ या भागात रस्त्यावर तोल कंपनीने कोणतेही गटार व्यवस्थापन केले नसल्याने गटाराचे पाणी मुख्य महामार्गावर येत असल्याने या मार्गात चिखल मिश्रित गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे . तर या चिखल मिश्रित पाण्यात दुचाकी स्वार घसरून पडल्याने अनेक अपघात या ठिकाणी होत असल्याने येत्या दहा दिवसात या वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका केली नाही तर वंचितच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असाल्याचा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिला आहे .