नाशिक/प्रतिनिधी – राज्यभरात वाढत्या उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईची धग जनतेला बसत आहे. पाण्यासाठी लोकांची वणवण पाहायला मिळत आहे. पाणी नसल्यामुळे शेतातली पीकं सुकायला लागली आहेत. नाशिक मधील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याचे टँकर विकत घेऊन त्या पाण्यावर वाळत चाललेले पीक जगवले. कांद्याचा एकरी एक लाख ते सव्वालाख रुपयांपर्यंत खर्च आला. पण आता एवढ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये कांद्याला बाजार भाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 400 रुपयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1751 ते 1200 रुपये दर मिळत आहे. या दरात उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी एकनाथ गायकवाड यांनी सांगितले. शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकाऱ्यांकडून केली जात आहे.