नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या वस्त्यांमध्ये संरक्षक भिंती कोसळून मोठी जीवितहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. विशेषतः भांडुप परिसरामध्ये बहुसंख्य भिंती या धोकादायक अवस्थेत असून त्या घरावर कोसळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. काही ठिकाणी अशा भिंतींचा काही भाग कोसळल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. अशी माहिती वंचित कडून देण्यात आली.
या संरक्षण/आधार भिंतीचे दुरुस्ती व पुनर्बांधणी इत्यादी कामे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ तसेच जिल्हाधिकारी यानी समन्वयाने करणे गरजेचे होते. महापालिका प्रशासन व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा यासाठी सदरचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा यापूर्वी वंचित देण्यात आला होता असे असूनही या विषयाकडे प्रशासनाने सोईचे दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी दिनांक 17 पासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे.
भांडुप "एस" वॉर्ड समोर हे आंदोलन होणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे."आधार भिंतींच्या कामाच्या बाबतीत प्रचंड गोंधळ असून बेफिकीर प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी नागरिकांची फरफट होत आहे, लोक मृत्यूमुखी पडल्यावर प्रशासन जागे होणार का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील सर्व जीर्ण आणि धोकादायक भिंतीचे बांधकाम तातडीने करावे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, खाजगी-शासकीय असा भेद न करता सरसकट भिंतीचे बांधकाम हाती घ्यावे, झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट व उच्चस्तरीय चौकशी करावी,
आयआयटी मुंबई यांच्या सूचनेनुसार शासनाने यावर ठोस कृती कार्यक्रम निर्धारित करून होणारे अपघात रोखावेत. व नागरिकांचे पुनर्वसन SRA योजने अंतर्गत करण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.