जळगाव/प्रतिनिधी – अवकाळी पडणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे राज्यातील शेतकरी मेटकुटीला आला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत हलाकीची झालेली आहे. शेतात घाम गाळून आणि अमाप पैसा खर्च करूनही निसर्ग आयत्या वेळेला शेतकऱ्यासोबत खेळी खेळतो. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती काही वेगळी नाही. चोपडा तालुक्यातील पूर्व भागात बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे लगत असलेल्या शेतात केळी बागेचे नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेल्या केळीची झाडे अक्षरशः जमिनीवर आडवे झाले आहे. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात आठ हजार केळीची रोपं लागवड केलेली होती. केळी पिकाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला.
काल आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे शेतातील 70 टक्के केळीची झाडे आडवी झाली आहेत. त्यामुळे आता केळी बागेवर केलेला खर्च तर सोडूनच दया, पण यातून शेतकऱ्याला एक रुपयाचा देखील फायदा होणार नाही आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या केळी पिकाचे तात्काळ पंचनामे करून शासनाने भरपाई देण्याची मागणी केळी उत्पादक शेतकरी भानुदास पाटील यांनी केली आहे.