नेशन न्युज मराठी टीम.
ठाणे – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुमारे २० हजार ३२६ बे़डस् उपलब्ध असून त्यापैकी ९०४४ ऑक्सिजन बेडस् आहेत. एप्रिल २०२१ मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. नागरिकांनी सावधानता बाळगत कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसी मध्ये ६८२५, डिसीएचसी मध्ये ६९२८, डिसीएचमध्ये ६५७३ अशा एकूण २० हजार ३२६ रुग्णशय्यांची उपलब्धता आहे त्यामध्ये विलगीकरणासाठी ८४९०, ऑक्सिजनची सोय असलेल्या ९०४४, अतिदक्षता विभागातील २७९२ रुग्णशय्यांचा समावेश आहे. दि. ३ जानेवारी रोजीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा पॉझीव्हीटी दर हा सुमारे ७.४५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ८ लाख ९१ हजार ४८७ एवढया चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात ६ हजार ३१८ सक्रीय रुग्ण असून त्यापैकी ९०० रुग्ण सीसीसीमध्ये, २४९ रुग्ण डीसीएचसी मध्ये, ४६४ रुग्ण डीसीएच मध्ये उपचार घेत असून सुमारे ३ हजार ३९६ रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. ३४४ रुग्ण ऑक्सीजनवर असून २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.ठाणे जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रीय रुग्ण संख्या होती. त्याला २१९ मेट्रीक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पीएसए प्लांट, लिक्विड मेडीकल ऑक्सिजन साठविण्यासाठी टाक्या, सिलेंडर्स यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ३१ पीएसए प्लांट प्रस्तावित असून त्यापैकी २६ प्लांटच्या माध्यमातून ४५ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. तसेच सध्या ६७२ मेट्रीक टन लिक्विड मेडीकल ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता जिल्ह्यात विकसीत केली असून अजून २७० मेट्रीक टन साठवणूक क्षमता विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे श्री. नार्वेकर यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून उपचारांच्या सुविधेसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनोवर देखील भर दिला जात आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप आपला पहिला अथवा दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी त्वरीत घ्यावा. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे या कोरोना त्रिसुत्रीचा अवलंब करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.



