नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनधी – देशात आणि राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून विभिन्न धर्मियांमध्ये द्वेषाचे विष पेरले जात आहे. सर्वत्र द्वेषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे बेरोजगारीने युवक त्रस्त झालेले असतांना त्यांची माथी धर्माच्या नाव- वर भडकवली जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या या धोरणांचा पर्दाफाश करण्यासाठी आणि विभिन्न धर्मियांमध्ये एकोपा वृद्धींगत होण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे राज्यभरात जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे, अशी माहिती स.पा. चे युवा प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी परिषदेत दिली.
जनसंवाद यात्रेनिमित्त फहाद अहमद यांच्यासह महिला प्रदेश अध्यक्षा माया चौरे या धुळ्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गुड्ड काकर, जमील मन्सुरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद यांनी समाजवादी पार्टीचे धोरण स्पष्ट करीत राज्य व केंद्रातील सरकारवर टीकास्त्र सोडले. देशभरात जातीयवादी शक्तींनी उच्छाद मांडला आहे. प्रत्येक धर्मात एकमेकांबद्दल पूर्वी असलेली आदराची भावनाच नष्ट करण्याचा प्रयत्न या सरकारकडून केला जात आहे, याचा समाजवादी पार्टी निषेध करीत आहे.
धुळे महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. विशेष म्हणजे राज्य आणि केंद्रात देखील त्यांच्याच पक्षाची सत्ता असतांना धुळ्यातील नागरिकांना आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, ही संतप्त बाब आहे. वास्तविक पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. पाण्यापसून कुणी वंचित राहत असेल तर ही बाब त्याच्या मूलभूत हक्कांवर गदा आहे. याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारला जाईल. धुळ्यातही इतरही अनेक समस्या आहेत. यावर पक्ष कटाक्षाने लक्ष ठेवणार असून जनतेसाठी प्रसंगी लढा दिला जाईल, असेही फहाद अहमद यांनी स्पष्ट केले. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचाही त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. लोकशाहीची ही गळचेपी असल्याची टीका करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली केली.



