नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पंढरपूर/प्रतिनिधी – डेंग्यू हा डासांमुळे होणार गंभीर आजार आहे. भारतात पावसाळ्याच्या दिवसांत सर्वात जास्त वेगाने डेंग्यू पसरल्याचे निदर्शनास आले आहे. देशात दरवर्षी डेंग्यूमुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. म्हणूनच डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात डेंग्यू जनजागृतीसाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज पंढरपुरात मलेरिया विभागाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलित डेंग्यूला आळा घालण्यासाठी गप्पी मासे पाळणे, दूषित पाण्याची स्वच्छता, आठवड्यातून एक दिवस कोरडा साजरा करणे अशा रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतची जागृती करण्यात आली. पंढरपूर नगरपालिकेच्या मलेरिया विभागाच्या वतीने ही प्रभाग फेरी शहरातून काढण्यात आली. त्यावेळी ठिकठिकाणी गप्पी मासे आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच पोस्टरच्या माध्यमातून डेंग्यू आजार कसा संपुष्टात आणता येईल हे सांगण्यात आले. राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.