नेशन न्युज मराठी टिम.
ठाणे – वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जनतेला पुन्हा महागाईच्या खाईत लोटण्याचा निर्णय घेण्यात आला असून १८ जुलैपासून आता अनेक दैनंदिन वस्तूंसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. डेअरी आणि कृषी उत्पादने यावरील जीएसटी रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
जीएसटी काऊन्सिलच्या ४७ व्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ जुलैपासून काही नवीन उत्पादने आणि काही वस्तू आणि सेवांवरील जीएसटीच्या दरात वाढ केली आहे. या बैठकीत नॉन-ब्रँडेड पॅकेज्ड स्थानिक डेअरी आणि कृषी उत्पादने ५ टक्के कर दर स्लॅब अंतर्गत आणण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेल आणि फिटमेंट कमिटीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. सध्या, ब्रँडेड आणि पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थावर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. प्रचंड महागाई असताना सामान्य जनतेच्या विरोधी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत व महिला आघाडी अध्यक्ष मायाताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व जिल्हा कार्यालय मधील उपायुक्त परदेशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी यांच्यासह ठाणे जिल्हा अंतर्गत सर्व पुरुष व महिला कमिटीचे अध्यक्ष व त्यांची कमिटी व पदाधिकारी व उपस्थित होते , कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.