नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – सध्या राजकारणात बरेच दावे-प्रतिदावे, आरोप- प्रत्यारोप सुरू असून या राजकारणाला सर्वसामान्य जनता वैतागली आहे, असा संदेश देणारा पुतळा वरळी येथील एका सोसायटीत साकारण्यात आला आहे. या राजकीय भस्मासुर पुतळ्याचे नवीन वर्षात दहन करण्यात येणार आहे. गेले ३० वर्षापासून सामाजिक विषय हाताळणाऱ्या वरळी येथील गोपचार सोसायटीबाहेर राजकीय भस्मासुराचा मोठा पुतळा साकारण्यात आला असून याबाबत नागरिकांनी अभिप्राय लिहिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बदलत्या राजकारणाचे समीकरण नेमके काय आहे यावर जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊन राजकारण योग्य की अयोग्य, असा प्रश्न पडला आहे. त्याबद्दल नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवावा, यासाठी फलक देखील लावण्यात आले आहे. सध्याचे राजकारण हे सर्वच पक्ष आपापल्या सोयीनुसार करीत आहेत. वरळीच्या एका सोसायटीकडून मोठे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून त्यात सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न राजकारण योग्य कि अयोग्य यावर जनतेचे मनोगत, मत याच फ्लेक्सवर थोडक्यात लिहायचे असल्यामुळे आपली राजकारण्यांविषयी भावना व्यक्त करण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.
शेतकऱ्याला आपला माल रस्त्यावर फेकावा लागत आहे. लोकशाहीची हत्या ,लोकशाही टिकवावी लागेल. सरकार आणि राजकीय नेते यांच्या दुष्ट चक्रात सामान्य माणूस पिचला जातोय. देशाची लोकशाही धोक्यात आहे. अस्मानी संकटात देशाचे अन्नदाता (शेतकरी) उध्वस्त होतोय. एकीकडे लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळत नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न समोर उभा आहे. एकीकडे राजकीय लोकं आपापल्या पद, पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा यात आपले सुख पहात आहेत तर दुसरीकडे सामान्य जनता महागाईने होरपळली जातेय. या पुतळ्याचे ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता दहन करण्यात येणार आहे.