नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरु झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करीत होते. यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक ४ वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून २०१६ रोजी १४,५४९ कोटीची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात करण्यात आली.
खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंगरूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री मा. हरदीप सिंग पुरी व या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या. या मेट्रो -४ मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे तीन ते चार महिन्यापासून बंद पडले होते. त्यावेळी एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांची भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्याचे काम प्रगतीपथावर सुरू झाले.आज खासदार राजन विचारे यांनी पुन्हा एकदा सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला आहे. त्यावेळी पॅकेज क्रमांक 11, 12 व 4A चे अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण मैसके, नगर अभियंता ठामपा सोनाग्रा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुशा भोंगाळे, गोरख पाटील त्याचबरोबर जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उप शहर प्रमुख संतोष शिर्के, सदाशिव पूर्णेकर, विभाग प्रमुख प्रतिक राणे, प्रदीप पूर्णेकर, अरविंद भोईर, संजय दळवी, राम काळे, विभाग संघटक गीता चव्हाण, ज्योती कदम व इतर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज खासदार राजन विचारे यांनी कापुरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सुरज वाटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदर पाडा अशा व इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली आहे. ज्या ठिकाणी मेट्रो नी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेट लावून ती जागा बंद करावी जेणेकरून अपघात टळू शकतील प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्विस रोड डीपी मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंतांना केल्या आहेत. खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करू असे आश्वासन दिले आहे.
अंतर्गत मेट्रो यासाठी महापालिकेने १० हजार ४१२.६१ कोटी इतक्या रकमेचा डीपीआर तयार असून तो आपल्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्र ९ व ठाणे मेट्रो ४ ए याला जोडण्यासाठी या मेट्रो मार्ग क्र १० गायमुख ते मीरा भाईंदर यालाही जोडण्यासाठी सर्वात पहिली मागणी करण्यात आली होती. या मेट्रो मार्गालाही राज्य शासनाची ०६ सप्टेंबर २०१९ रोजी ४ हजार ४७६ कोटीची मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, अमर मेहल, शिवाजी चौक काशिमिरा या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अद्याप केंद्र शासनाची परवानगी मिळालेली नाही. अशी माहिती त्यांनी दिली.
मेट्रो मार्ग क्रमांक ५ कापुरबावडी, ठाणे ते भिवंडी याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.ज्ञानसाधना कॉलेज भुयारी मार्गाच्या धर्तीवर लुईसवाडी ते धर्मवीर मार्ग पाचपाखाडी दरम्यान नवीन भुयारी मार्गाची निर्मिती करण्याची मागणी आहे. हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूस ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांसाठी सर्विस रोड तयार केले होते. परंतु घाटकोपर वरून येणारी कासारवडवली ठाणे मेट्रो ४ चे काम सुरू झाल्यानंतर त्याचे पिलर हायवेवर येत असल्याने हायवे वरील सर्व वाहतूक सर्विस रोडवरून फिरवली असल्याने हाजुरी, लुईसवाडी या परिसरातील नागरिकांना नितीन कंपनी सिग्नलवर जाण्याकरिता हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करावा लागत आहे. त्याचा त्रास तेथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना होत आहे. लुईसवाडी येथील स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार लुईसवाडीतील शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना दळणवळणासाठी ठाणे शहरात ये-जा करावी लागते. या ठिकाणी असलेल्या उचं पादचारी पुलाचा वापर जेवढा करायला पाहिजे तेवढा करत नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची स्वतःची वाहने शहराच्या दिशेने जाण्याकरिता नितीन सिग्नल पर्यंत किंवा तीन हात नाका सिग्नल पर्यंत पोहोचविण्यासाठी विरुद्ध दिशेचा वापर करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. हे रोखण्यासाठी ज्ञानसाधना कॉलेज येथे केलेल्या भुयारी मार्गाच्या धरतीवर लुईसवाडी ते धर्मवीर मार्ग पाचपाखाडी येथे नवीन भुयारी मार्गाची निर्मिती करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी एम एम आर डी ए आयुक्तांकडे केली आहे.