नेशन न्यूज मराठी टीम.
पालघर / प्रतिनिधी – नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे अनावरण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी /विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी /विद्यार्थिनी /समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.
हा उपक्रम 3 टप्प्यात आयोजित करण्यात येणार असून प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी करण्यात येत आहे तदनंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्यात करण्यात येईल. या उपक्रमाच्या नोंदणीकरीता शैक्षणिक संस्थां दिनांक 31ऑगस्ट 2023 पर्यन्त आणि उमेदवार त्यांच्या संबंधित संस्थेच्या नावाखाली दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यन्त अर्ज करु शकतील. सदर चॅलेंजची नोंदणी करण्याकरीता www.msins.in अथवा https://schemes.msins.in किंवा खालील QR Code स्कॅन करुन नोंदणी करावी.
या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्था सहभागी उमेदवारांसाठी संस्थास्तरावर सादरीकरण सत्र आयोजित करेल व संस्थेतील 2 संकल्पनांची निवड पुढील टप्प्याकरिता करण्यात येईल. संस्थास्तरावरील निवडलेल्या संकल्पनांमधून 100 उत्कृष्ट संकल्पनांची निवड जिल्हास्तरावरील सादरीकरणाकरिता करणेत येईल.
दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरावर सादरीकरण सत्राकरिता निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी, स्टार्टअप प्रवासाच्या मुलभूत गोष्टींबद्दल माहिती व सादरीकरण कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 1 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. जिल्हास्तरावर निवडलेल्या 100 नवउद्योजकांना सादरीकरणाची संधी दिली जाईल. सहभागींचे मुल्यांकन ज्युरी मार्फत स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या पोर्टलवर करण्यात येईल. जिल्हास्तरावर सादरीकरण सत्रातून 10 विजेते निवडले जातील. प्रत्येक विजेत्याला 1 लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल.
तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 10 अशा एकूण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इनक्युबेशन प्रोग्राम राबविण्यात येईल व 360 संकल्पनांच्या राज्यस्तरीय सादरीकरणातून उत्तम 10 विजेत्यांना 5 लाख रुपयांचे बीज भांडवल मिळेल. तरी ह्या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रभाकर हरडे यांनी केले आहे.