नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन झाले.मराठा बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषनाचे हत्यार उपसून सरकारला मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सांगितले. आता पुन्हा जरांगे पाटील यांनी चार दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यात त्यांची प्रकृती जास्त खालावत चालली आहे. पण सरकार त्याकडे लक्ष न देता फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त दिसत आहे.
यावरून कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत सरकारचे चांगलेच कान टोचले आहेत. सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे असा सल्लाही आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये असही आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.
