जालना/प्रतिनिधी – सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने जालन्यात (Jalna) पाण्याचं संकट पाहायला मिळतंय. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जालन्यातील अनेक गावांत पाण्याअभावी बहरलेल्या फळ बागांचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला माल जळून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही. असे असताना देखील नुकसान झालेल्या बागांचा प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी या जळालेल्या फळबागा घेऊन आज शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. तसेच पुढील 7 दिवसात आम्हाला २ लाख रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी (Farmers) केली आहे. प्रशासनाने ८ जून पर्यंत आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे.